Spread the love

 

कोकणच्या मातीचा उत्स्फूर्त आविष्कार -दशावतार

सतीश पाटणकर

 ‘दशावतार’ ही कला म्हणजे कोकणच्या मातीचा एक उत्स्फूर्त आविष्कार आहे. धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेचा वारसा कोकणच्या मातीत कोकणी माणसानं आजमितीपर्यंत आवर्जून जपलेला आहे. दशावतार हे त्याचे ठळक उदाहरण आहे. तो कोकणी माणसाचा सांस्कृतिक ठेवा आहे.

         थंडीची चाहूल लागली म्हणजे कोकणातील ‘जत्रां’ना सुरुवात होते. काही ठिकाणी या जत्रांना ‘दहीकाला’ असे म्हणतात. नोव्हेंबर महिन्यापासून या जत्रा चढत्या भाजणीने सुरू असतात. सिंधुदुर्गातील राजापूरपासून थेट वेंगुल्र्यापर्यंत दशावतारी नाटके केली जातात. दशावताराचं रंगमंचीय आविष्करण पाहण्यासाठी कोकणी माणूस नेहमीच उत्सुक असतो. म्हणूनच दशावतार हा कोकणी माणसांच्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे असे म्हटल्यास ते अतिशयोक्तीचे ठरू नये.

मालवणी दशावतार नाटक म्हणजे एक अजब प्रकारआहे. लोककलेचा हा प्रकार तळकोकणात आजही टिकून आहे. शेकडो वर्षांपासून फक्त लोकाश्रयाने जगत आलेली हि कला  मालवणी माणसाला अद्याप भुरळ घालून आहे. टी.व्ही. इंटरनेटच्या आजच्या जमान्यातही गावात मात्र गर्दी करून गावातली माणसं रात्री जागून हमखास दशावतारी नाटकं बघतात. दशावतार म्हणजे विष्णूचे दहा अवतार. त्या अवतारांच्या अनुषंगाने रचलेल्या काल्पनिक कथा नाट्यरुपात रंगवून केलेले त्याचे
सादरीकरण म्हणजेच दशावतारी नाटक. दशावतारी नाटक हे तळकोकणातील(सिंधुदुर्ग जिल्हा) गावातील देव-देवता, ग्रामदेवतांच्या जत्रा,उत्सवाचा अविभाज्य घटक आहे.

kaleshwar Dashavtar2

तुळशीच्या लग्नानंतर साधारणपणे भातकापणीच्या हंगामात, दरवर्षी ठरविक तिथीला सिंधुदुर्गातील प्रत्येक गावात कोणत्या न कोणत्या देवाचा उत्सव चालू होतो. या उत्सवाला मालवणीत ‘सप्तो’ असे म्हणतात. ‘सप्तो’ म्हणजे सप्ताह(जो काही ठिकाणी सात दिवस चालतो). हे उत्सव त्या त्या देवस्थानांचे ठरलेले वार्षिक उत्सव असतात. या उत्सवामध्ये जत्राही भरते. देवीची पूजा. गाऱ्हाणी,नवस, पालखी आणि सर्वात शेवटी (म्हणजे रात्री उशीरा) दशावतारी नाटक. हे देवळाच्या आवारातच केले जाते. देवळाच्या सभामंडपामध्ये किंवा देवळाच्या बाहेर छोटासा प्लॅटफॉर्म उभारला जातो. त्याची दिशा देवाकडे असते. दशावतारी कलाकार या स्टेजवर उभे राहून देवाकडे तोंड करून नाटक सादर करतात. जणू काही ते नाटक बघणाऱ्या प्रेक्षकांमध्ये देवळातला देवही एक आहे.  या नाटकाला नैपथ्य नाही. मध्ये एक लाकडी बाक ठेवतात. त्याच्यावरच जो कोणी (विष्णू/ यम / नारद / सामान्य भक्त कुणीही )येईल त्याने बसायचे. हा बाक म्हणजेच सिंहासन/दगड/खुर्ची/पलंग/ नदीकाठ/ज्याप्रमाणे प्रसंग असेल त्याप्रमाणे त्याचे स्वरूप बदललेले समजायचे. नाटकाला संहिता नाही. संवादही उत्स्फूर्त, तिथल्या तिथे म्हटलेले. दिग्दर्शक नाही. एक सूत्रधार असतो तो नाटकाच्या काही काळ आधी कुठच्या कथेवर नाटक करायचे ती कथा समजावून सांगतो. आणि कामं वाटून देतो. त्याप्रमाणे कलाकारांनी अभिनय, संवाद फेक स्वतःच ठरवून करायची आणि कथा उलघडत न्यायची. 

या कथा पौराणिक असतात. रामायण, महाभारत, आणि विष्णूपुराणातल्या. जी कथा सादर होते त्यात मूळ कथाबीज असते आणि बाकीचा कथेचा भाग काहीसा उत्फूर्तपणे कलाकारांकडूनच त्या भोवती गुंफला जातो. त्यामुळे नाटक कलाकारच पुढे नेतात. आणि असे हे नाटक रात्री १०-११ वाजता जे सुरु होते ते पहाटे तीन-चार वाजेपर्यंतही (कधी कधी त्या नंतरही) चालू शकते.  मालवणी दशावतारी नाटकाला गावातील लोक ‘धयकालो’ असंही संबोधतात. 

दशावतारी नाटकाचा उगम कसा आणि कुठून झाला हे सांगणे अवघड आहे. त्याचा इतिहास विखुरलेल्या स्वरूपात मिळतो. याबाबतीत बहुतेक मते वेगवेगळी असून, त्यांना फारसे पुरावे देखील नाहीत. मराठी विश्वकोशात नोंदल्याप्रमाणे १७व्या शतकातील रामदासांच्या दासबोध ग्रंथामध्ये  (‘देवशोधननाम’ या सहाव्या दशकातील आठव्या  समासामध्ये)   दशावतार नाटकाबद्धल  खालील उल्लेख आढळतो. 

खेळता नेटके दशावतारी

तेथे येती सुंदर नारी

नेत्र मोडिती कलाकुसरी

परी ते अवघे धटिंगण

kaleshwar Dashavtar4
kaleshwar Dashavtar

त्यावरून १७ व्या शतकात दशावतारी नाटके होत असत असा निष्कर्ष जरी काढता आला तरी त्याला अन्य पुरावा नाही.  मात्र तेराव्या शतकाच्या आधीपासून अशा प्रकारचे खेळ प्रचलित आहेत असा उल्लेख ‘ज्ञानेश्वरी’त आहे. (‘लोकगंगा’ या पुस्तकात याचा उल्लेख आहे)इ. स. १७२८ मध्ये शामजी नाईक काळे यांनी दशावताराचा पहिला प्रयोग राजापूर तालुक्यातील आडिवरे येथे महाकालीच्या मंदिरामध्ये केला होता. याची नोंद चिं. कृ. दीक्षित यांनी ‘आडीवऱ्याची महाकाली’ या आपल्या पुस्तकात केला आहे. त्यांनी कर्नाटकातून हा नाट्यप्रकार इथे आणला असे त्यांचे म्हणणे  आहे. तर पु. गो. काणेकर आपल्या ‘नाट्यस्मृती’ या पुस्तकात म्हणतात कि काळे यांनी दशावतारची कला कोकणातूनच आडीवऱ्याला नेली. वि . कृ. जोशी यांनी या दोन्ही मतांना धरून ती कला कोकणातून जन्मली तरीही कर्नाटकातील कलेच्या मार्गाने आली आहे असे म्हटले आहे. 

कोकणातील दशावतारी नाटकाचा सर्वात जुना उल्लेख सुमारे आठशे वर्षांपूर्वीचा मानतात. लोकगंगा या पुस्तकात लिहिले आहे कि सिंधुदुर्गात प्रथम दशावतारी नाटक केशव गोरे यांनी वालावल येथे (ता. कुडाळ, सिंधुदुर्ग) नारायणाच्या देवळात सादर केले. केशव भटजी कडून दशवताराचा पेटारा वालावलकर यांनी स्वीकारला. आज वालावलकरांची तेरावी पिढी दशावतार नाटक सादर करीत आहे. याचबरोबर  आजगावकर,कलिंगण, मोचेमाडकर, पार्सेकर, खानोलकर, चेंदवणकर अश्या अनेक नाटक कंपन्यानी दशावतार कला पिढ्यानपिढ्या जोपासली आहे. बाबी कलिंगण आणि बाबी नालंग हे दशावतार नाटकातील दोन नावाजलेले कलाकार.

कनार्टकात जो नाट्यप्रकार आहे त्याला ‘यक्षगान’ म्हणतात. भागवतपुराणातल्या कथांवर हा नाट्यप्रकार आहे. दशावतारी नाटक, यक्षगान जवळजवळ भासत असले तरी त्यांत फारसे साम्य नाही.दशावतारी नाटकात संशोधन करणारे डॉ . तुलसी बेहेरे यांनी यावर सखोल अभ्यास केला आहे. त्याच्या दाव्यानुसार दशावतार आणि यक्षगान मध्ये खुपच फरक आहे. यक्षगानात मुख्य भर नृत्य गायनावर असतो. तर दशावतारी नाटकात उत्स्फूर्त संवादफेक रांगडा अभिनय, यावरच भर आहे. यक्षगानामध्ये सगळ्या दहा अवताराचे presentation होत नाही. दशावतारी नाटकात ते होते/किंवा ते अवतार गाण्याच्या स्वरुपात सूत्रधार सांगतो. दक्षिणेतल्या मंदिरांमध्ये देवदास, देवदासी प्रथा होत्या त्यातून अनेक लोककला आणि शास्त्रीय कलानी जन्म घेतला. कोकण परिसरात देवाला वाहिलेल्या भावीणी असत. त्यांच्यापासून जन्मलेला देवळी समाज, पुरातन काळी मुख्यत्वाने दशावतारी नाटक हा व्यवसाय करी. पुढे इतर समाजातील लोकांनीही त्यात  पुढाकार घेतला. 

हिस्टरी ऑफ इन्डीयन थेटर भाग २ या मनोहर वारपांडे यांच्या पुस्तकात त्यांनी दशावतार नाटकाच्या उगमाबद्धल वेगळी माहिती दिली आहे. कोकणचा भाग पूर्वी गोमंतक म्हणून ओळखला जाई. त्या गोमंतकाच्या early folk theatre मध्ये ‘जागर’ म्हणून एक कला होती, ज्यात कृष्ण कथा रंगवल्या जात. पूर्वरंगात स्त्री वेशातील कलाकार कृष्णाची प्रतिमा  घेऊन नाचत असे. उत्तररंगात मडू (madu ) आणि कैताभ (kaitabha ) तोंडावर भयंकर मुखवटे घालून येत आणि त्यांचा संहार मत्स्य रूपातील विष्णू/कृष्ण करे. भरताच्या नाट्यशास्त्रात युध्द/ संहारा समयी विष्णू/कृष्ण यांच्या अभिव्यक्तीच्या चार वृत्ती लिहिलेल्या आहेत. त्या वृत्तिंचे दर्शन जागर मध्ये होत असे.गोमंतकाच्या याच early folk theatre मध्ये दशावताराचे बीज आहे. त्या दशावतार चे ‘दशावतार काला’ , ‘गोपाळकाला’ आणि ‘गौळणकाला’ असे भाग होते . काला म्हणजे प्रसाद. गोपगोपी श्रीकृष्णाला म्हणतात ‘अमुच्या शिदोऱ्या एकत्र करोनी , काला वाटसी तू चक्रपाणी’दशावतार नाटक पण एकप्रकारचा कालाच असते. नाट्य, अभिनय, संगीत, गायन यांचा एकत्रित मिलाप त्यात होतो. 

दशवतारी नाटक म्हणजे नुसते ‘आख्यान’ नव्हे तर देवतेच्या उत्सवाशी ते घट्ट बांधलेले आहे. दशावतारी नाटक सुरु होण्यापूर्वी ग्रामदेवतेची पूजा, गाऱ्हाणी, नवस, पालखी संपन्न होते. त्यानंतर नांदी/धुमाळी गणेशपूजन, शारदास्तवन. आडदशावतारातील संकासुराची कथा , दशवतारांचे दर्शन, आख्यान , दहीकाला, समराधना. असा संपूर्ण कार्यक्रम म्हणजे दशावतार नाटक. कालांतराने यातले  दशवतारांचे दर्शन, समराधना हे भाग गाळले गेले. ‘दहीकाला’ म्हणजे खरा दही हंडी फोडण्याचा कार्यक्रम, हा पहाटे नाटकाच्या उत्तरंगात होतो. पण गावातले बहुतेक दहीकाल्याला कुणी थांबत नाहीत. दहीकाला कृष्ण, गौळण इ. करतात, हंडी मानकरी कलाकाराकडून फोडली जाते. पण बहुतांशी लोकांना दशावतारी नाटक म्हणजे फक्त आख्यान एवढेच माहित असते. बहुदा बरेचजण नाटक पाहता पाहता झोपेने गारद होतात. 

देवळाच्या आवारातच चार कोपऱ्यात चार मेढी उभारतात. त्यावर ताडपत्रीचे छप्पर. प्रकाशासाठी पूर्वी खांबाच्या आडोशाला दोन दिवे, कंदील, पेट्रोमॅक्स बत्ती वापरायचे , आता विजेचे दिवे लावतात.दशावतारी नाटकात जे कलाकार असतात, ते जिथे उत्सवाचे निमंत्रण असेल तिथे आपला दशावताराचा पेटारा घेऊन दाखल होतात. त्याच्या या पेटाऱ्यात रंगभूषा, वेशभूषा यांचे सामान असते. तसेच गणपती, रावण, यक्ष, संकासूर यांचे मुखवटे देखील असतात. या पेटाऱ्याचे महत्व दशावतारी नाटकात अनन्यसाधारण आहे. नाटक सुरु होण्याआधी त्याच्या पुढे समई पेटवून ठेवली जाते. मुखवटे वापरण्यापूर्वी त्यांची पूजा केली जाते. नाटक कंपनी उत्सवाच्या वेळी गावोगावी पेटारा घेऊन देवस्थानात नाटक सादर करते. त्याची वार्षिक बिदागी त्यांना देवस्थानतर्फे/गावकऱ्यांकडून दिली जाते.

       दशावतारी नाटकाची सुरवात धुमाळीने होते. पखवाज वाजवणारा जोरजोरात वाजवतो. त्यानंतर मंगलाचरण सुरु होते आणि पूर्वरंग सुरु होतो. पूर्वरंग: यात सगळे कलाकार येऊन उभे राहतात. मध्ये सूत्रधार.  मग गणपती येतो, रीध्धी सिद्धी त्याच्या दोन्ही बाजूला असतात. कधी कधी कलाकार माणसं कमी असली तर गणपती एकटाच येतो. गणपती नमन झाल्यावर सरस्वती स्तवन होते. त्यानंतर प्रवेशाचा इशारा देणारा लंगार सुरु होतो. (frantic music: प्रवेश सूचक संगीत). सूत्रधार एकेकाचे नाव पुकारतो त्याप्रमाणे कलाकार रंगमंचावर येतात. एक एक जण  येतो. त्याचे येणे म्हणजे जबरदस्त. येताना १५-२० फुटावरूनच तो आवेश घेऊन येतो आणि हे बघायला मिळते कारण रंगमंच तसा उघडाच. लोकांतूनच आवेशाने धावत कलाकार रंगमंचावर येतो. आपला पात्रपरिचय स्वतः स्वगतातून करतो.प्रसंग सादर करताना नसलेल्या गोष्टी कलाकारांना फक्त अभिनयातून दाखवायच्या असतात. उदा. आग/लागलेला वणवा , नदी, घनदाट जंगल , राजमहाल, युद्ध भूमी , आकाश असे बरेच काही.         

एक मात्र आहे. दशावतार हा प्रकार कोकणातला असला आणि तिथली बोलीभाषा मालवणी असली तरी नाटकातील संवादांची भाषा शुद्ध मराठी असते. पण मधुन मधून वेगळा बाज आणण्यासाठी एखादा प्रसंग (बहुतेकदा भक्त/सर्वसामन्य माणूस असलेला) मालवणीतून सादर केला जातो. लोकांना हे खूप आवडते. या अस्सल मालवणी प्रसंगांना लोक भरभरून दाद देतात, शिट्ट्याबिट्ट्या मारतात. कधीकधी एखाद्या कलाकाराला कोणी गावकरी बक्षीस देतो ते मधेच प्रसंग चालू असतानाच थांबवून सूत्रधार जाहीर करतो. हे फारच मजेशीर आहे.  

पूर्वरंगातील संकासुराची गोष्ट आणि त्यानंतरचे दशावतारांचे दर्शन म्हणजे आडदशावतार. आडदशावताराची सुरवात मत्स्यावतार या  गोष्टीने होते. यात संकासूर नावाचा राक्षस ब्रम्हदेवाकडून वेदांची चोरी करतो आणि विष्णू त्याचा संहार करतो. संकासूर काळे कपडे घालतो. आणि लाल जीभ लावतो. तो सुत्राधाराबरोबर मजेशीर संवाद पण करतो कारण तो दैत्य पण आहे आणि विदुषक पण. बाकीचे  सगळे अवतार सूत्रधाराच्या गाण्यातून सांगितले जातात. कूर्म, वराह यांची सोंगे कधीकधी दाखवली जातात. त्यानंतरचा नरसिंह अवतार दाखवतात. कारण तो लोकप्रिय आहे. वामन, परशुराम यांचे उल्लेख करतात. राम/ कृष्ण यांचे अवतार दाखवतात. आणि उत्तररंगात त्यावर आधारलेली एखादी  कथा दाखवली जाते. कधीकधी हि कथा विष्णूपुराणातीलही असू शकते. 

हे एखाद्या पौराणीक कथेचे आख्यान असते. उदा. मी पहिलेल्या नाटकात ‘वैष्णव या विष्णूभक्ताच्या भक्तीची कथा सांगितली होती. या भागात युद्धे होतात. पखवाज, पेटी, झांज यांचा कल्लोळ होतो. शेवटी जो दानव असतो त्याचा संहार होतो आणि सुखांत होतो.नाटकाच्या शेवटी हंडी फोडून दहीकाला (प्रसाद )वाटला जातोराक्षस विशेष असतात. त्यांच्या रौद्र, भयानक वेशभूषा, अक्राळ-विक्राळ हसणे आणि 

आवेशात धावत येणेही  बघण्यासारखे. युद्ध हा प्रकारहि बघण्यासारखा असतो. ते एक प्रकारचे नृत्यच असते त्याला लंगार नृत्य म्हणतात. त्यात प्रतीद्वंद्वी एकमेकांकडे आवेशाने पाहत, फेर धरून गोल गोल  फिरत राहतात. दैत्याच्या पायात घुंघरू बांधलेले असतात. त्यामुळे त्यांच्या या युद्धनृत्याला एक प्रकारचा ठेका मिळतो. युद्धाच्या वेळी सूत्रधार धुमाळी किंवा केरवा ठेक्यामध्ये गाणी, पारंपरिक गीतरचना घेऊन, त्यावर त्या तालाचा साज चढवतो. युद्धासाठी खोट्या बनवलेल्या गदा, तलवारी यांचा वापर करतात. शेवटी दैत्य धारतीर्थी पडला कि नाट्याचा शेवट होतो. विष्णूचे दहा अवतार म्हणजे दशावतार. पण यापैकी वामन, परशुराम, राम व कृष्ण या चार अवतारांचीच रंगमंचीय आवृत्ती आपण पाहत असतो. दशावतार हा कर्नाटकातून कोकणात आला असावा, असा एक समज आहे. कारण कर्नाटकचे यक्षगान व कोकणचा दशावतार यात बरेचसे साम्य आहे.

दशावतार सादर करणाऱ्या प्रमुख कंपन्यांचा मुख्य आधार आहे तो दरवर्षी गावच्या देवळांत होणाऱ्या जत्रा. त्यातही काही कंपन्या वर्षांनुवर्षे विशिष्ट गावांतील जत्रेला बांधलेल्या असतात. काही वर्षांपूर्वी दशावतार सादर करणाऱ्या मोजक्याच कंपन्या होत्या, पण अलीकडे यात बऱ्यापैकी भर पडली आहे, तरीही वालावलकर, पार्सेकर, मोचेमाडकर व चेंदवणकर या नावाची मोहिनी रसिकांवर आजही आहे. या कंपन्यांचं अनुकरण करून कालांतराने नव्या कंपन्या उदयास आल्या आणि दशावतार अधिकाधिक लोकाभिमुख झाला. वर उल्लेखिलेल्या कंपन्यांची काही खास वैशिष्टय़े आहेत. त्यात रंगभूषा, वेशभूषा, अभिनय, संवादफेक,  संगीत कथानक, युद्धनृत्य आणि सादरीकरण या बाबींचा समावेश आहे. रसिकांच्या वैयक्तिक आवडीनुसार दशावतारी नाटकातील ते ‘नाटय़’ अनुभवण्यास रसिक एकाच रात्री एकापेक्षा अनेक दशावतारी नाटके पाहणे पसंत करतात. त्यातही नामांकित कंपन्यांतील कसबी कलाकार कथावस्तूप्रमाणे राजा-राणी, ऋ षी, राक्षस, कृष्ण, नारद आणि देवदेवतांची पौराणिक आणि रामायणकालीन ‘रूपे’ कशा पद्धतीने सादर करतात हे पाहण्यासाठी दर्दी रसिक जिवाचं रान करतात.

         रसिकांना वर्षांनुवर्षे आपल्या अभिनयाची मोहिनी घालणाऱ्या दशावतारी कलाकारांची या कलेतून मिळणारी आर्थिक मिळकत मात्र तुटपुंजीच आहे. कंपनीतील प्रमुख पात्रांना मिळणारे मानधन समाधानकार असले तरी दुय्यम कलाकारांची बिदारगी अपुरीच आहे. अर्थात कंपन्यांचं आर्थिक बजेटही याला कराणीभूत आहे.  मात्र असे असूनही कलाकार कलेच्या श्रद्धेपोटी निष्ठेने काम करीत आहेत.दशावतारी नाटकांचे सादरीकरण वर्षांनुवर्षे सुरू असलेल्या पद्धतीने आजही केले जाते. दशावतारी नाटकात प्रथम गणपतीस्तवन मग सुमधुर, ऋ द्धी-सिद्धी, सरस्वती, ब्रह्मदेव आणि संकासुर यांचे प्रवेश होतात आणि त्यानंतर मुख्य कथानक सुरू होते. दशावतारी नाटकाची लिखित संहिता नसते. स्वत:ची रंगभूषा करायला बसण्यापूर्वी नटमंडळींना रामायण, महाभारत आणि पुराण यातील सादर करावयाचे कथानक सांगितले जाते, त्यानुसार त्या कथानकातील पात्रे रंगमंचावर स्वत:चे संवाद बोलत असतात. इथे दखल घेण्याजोगी बाब म्हणजे लिखित संवाद नसूनही रंगमंचावर दोन किंवा तीन पात्रे एकत्र असूनही त्यांचा आपापसातील संवादाचा गोंधळ होत नाही. दशावतारी नटाचे हेच खरे कौशल्य मानले जाते.

 

             कोकणचा दशावतार व तो सादर करणारे कलाकार हे कोकणातील मातीचा उत्तुंग आविष्कार आहेत. कोकणवासीयांचं अविभाज्य अंग आहे. त्यामुळे ही कला यापुढेही चढत्या भाजणीत वृद्धिंगत होत राहील यात तिळमात्र शंका नाही.

              दशावतार म्हणजे विष्णूने जे दहा अवतार धारण केले ते – मत्स्य, कूर्म, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण, कलंकी व बुद्ध. यांपैकी पहिली चार रूपे मानवी नाहीत; ती प्राणी रूपे आहेत.  नववा अवतार कलंकी व दहावा बुद्ध. हे दोन अवतार ‘दशावतारा’त दाखवले जात नाहीत. ती सर्व पात्रे प्रत्यक्ष सभा मंडपात (रंगमंचावर) येत नाहीत. त्यातील काही प्रत्यक्ष रंगमंचावर येतात, तर काहींचा केवळ उल्लेख केला जातो.       

                   दशावतार हीकोकणाच्या सिंधुदुर्ग जिल्‍ह्यातील लोककला .पूर्वरंगातील कासूर-भटजी-गणपती, ऋद्धी-सिद्धी, सरस्वती, ब्रह्मा, विष्णू ही पात्रे आणि उत्तररंगात रामायण, महाभारत या पुराणांमधील आख्यान असे कार्यक्रमाचे स्वरूप असते. अर्थातच ते नाट्यरूपात सादर होते. 

गावगाड्यातपंचक्रोशीतील लोकांना एकत्र येण्याची, ठेवण्याची संधी म्हणजे जत्रा. जत्रेच्या जागी ‘दशावतार’ होतो. जत्रेतील विशिष्ट कामे विशिष्ट लोकांकडे सोपवली जातात. उदाहरणार्थ, देवाच्या पालखी च्या वेळी झांज आणि पखवाज वाजवणारे दशावतारीच पाहिजेत. ते त्या वेळचे मानकरी होत. देवळी हा देवाची सेवा करणारा, शिंगे वाजवणारा, पालखीपुढे मशाल धरणारा असतो.      

           कोकणातील देवळी, लिंगायत आणि गुरव समाजाचा गावोगावी जाऊन दशावतार सादर करणे हा व्‍यवसाय होता. दशावतार सादर करणारे कलावंत ही कला सादर करण्‍याचे कसब एकलव्‍याप्रमाणे स्‍वतः शिकतात, त्‍यांना कुणाकडूनही तालीम मिळत नाही. मंडळातील कलाकारांना रंगभूषा करण्‍यापूर्वी एकत्रितपणे सूत्रधाराकडून आख्‍यानाची कल्‍पना दिली जाते; भूमिका वाटून दिल्‍या जातात. वैशिष्ट्य म्हणजे त्यातील सर्व कलाकार हे पुरुषच असतात.गावातील देवाच्या वार्षिक उत्सवातही ‘दशावतार’ सादर केले जाते. जत्रेसाठी व दशावतार पाहण्यासाठी गावोगावचे लोक रात्री एकत्र जमतात. प्रथम स्त्रीवर्गाकडून देवीची ओटी भरली जाते, नंतर देवांची पालखी काढण्यात येते. त्यावेळेस ढोल, ताशा, सनई इत्यादी वाद्ये वाजवली जातात. देवाची पालखी घेऊन मृदुंग वादक- झांजवादक, चवर्‍या घेऊन भावीण असतात. त्यांच्यासोबत गावकरी देवळाभोवती प्रदक्षिणा घालतात. प्रदक्षिणा चालू असताना भजन, आरत्या व भटजी मंगलाष्टके म्हणून देवांची लग्ने लावतात. कार्यक्रम संपल्यावर ‘दशावतारी’ प्रयोगाला सुरुवात होते. पूर्वरंगात गणपती, सरस्वती, भटजी, संकासूर, विष्णू ही पात्रे दाखवली जाऊन नंतर आख्यानास सुरूवात होते. आख्यान मुख्यत: पौराणिक असते.दशावतारी जत्रेचा काळ सहा महिन्यांचा असतो. कार्तिक शुध्द दशमीपासून (ऑक्टोबर-नोव्हेंबर) ते वैशाख शुद्ध पंचमीपर्यंतचा (एप्रिल-मे महिना) तो काळ. रात्री दहा-अकरा वाजता सुरू झालेला दशावतार पहाटे झुंजूमूंजू होईपर्यंत चालतो.

             दशावतारात सर्वप्रथम सूत्रधार रंगभूमीवर येऊन विघ्नहर्त्‍या गणपतीला आवाहन करणारे धृपद म्हणतो. ते संपण्याच्या सुमारास रिध्दी-सिध्दीसहित गणपती रंगमंचावर येतो. त्याच्या मागोमाग सरस्वती येते. गणपतीचे आवाहन संपले, की सूत्रधार सरस्वतीची स्तुती करतो. सरस्वती त्याला आशीर्वाद देते. त्यानंतर प्रत्यक्ष खेळाला सुरुवात.

          नाटक सुरू होण्यापूर्वी पडद्यामागे धुमाळ म्हणजे गायन होते. नंतर मंगलाचरण व त्यावर गणपती-सरस्वतीचा प्रवेश असा क्रम असतो. पुढे वरयाचना व वरदान इ. प्रकारानंतर ब्रह्मदेवाचा प्रवेश, संकासुराचे वेदचौर्य व विष्णूकडून त्याचे पारिपत्य इ. कथाभाग होतो. या नंतर मात्र पुढचे सर्व कथाप्रसंग गाळून एकदम गोपी-कृष्णाच्या लीला दाखविण्यात येतात. येथे पूर्वरंग संपून उत्तररंगाला प्रारंभ होंतो. त्यात एखाद्या पौराणिक कथेचे आख्यान असते. सूत्रधार आपल्या पद्यांतून कथानकाच्या विकासक्रम दाखवितो, तर पात्रे आपापली भाषणे स्वयंस्फूर्तीने म्हणतात. देव-दावन आणि राजे-राक्षस यांच्या युध्दांची दृष्ये रंगमंचावर दाखविण्यात येतात. राक्षसाच्या प्रवेशाच्या वेळी राळ उडविण्यात येते व तो आरडा-ओरडा करीत तलवारीच्या फेका फेकत रंगमंचावर प्रवेश करतो. देव-दावनांच्या युध्द प्रसंगी मृदंग व झांजा वगैरे वाद्यांचा एकच गजर चालतो. अखेरीस राक्षसांचा पराभव होतो. खेळाच्या शेवटी हंडी फोडून दहीकाला वाटतात व नंतर आरती होऊन खेळाचा शेवट होतो.

                   देव-दानवांचे युध्द म्हणजे दशावतारी नाटकातील प्रमुख आकर्षण, राक्षसाच्या प्रवेशाच्या वेळी राळेचा भपकारा उडवीत व त्याचे सैन्य समोरच्या बाजूने प्रेक्षकांच्या गर्दीतून येतो. त्यांची ती भयानक रौद्र रूपे, आरोळया, हातातील लखलखणा-या तलवारी व रोळेचा उसळलेला डोंब यामुळे प्रेक्षक घाबरतात. आख्यानानंतर पहाटेच्या सुमारास गौळणकाला (गोपाळकाला) होतो. त्यावेळी नाटकातील स्‍त्री वेषधारी पात्र हातात आरती घेऊन ती प्रेक्षकांत फिरवितो. प्रेक्षक आरतीत पैसे टाकतात. जत्रेतील नाटकाचा शेवट गौळणकाल्याने होत असल्यामुळे त्याला ‘दहिकाला’ असेही म्हणतात.    दशावताराचे ठळक वैशिष्ट्य हे की यातील संवाद लिहिलेले नसतात. ते उत्स्फूर्तपणे व हजरजबाबी पद्धतीने, कथानुरोधाने केले जातात. संहिता नसताना पौराणिक नाटक सादर करणे मोठे आव्हान असते. संगीताचा बराचसा कार्यभाग नाईकजी पुरवतात. पूर्वरंगात केवळ संकासूर कोकणी (मालवणी) बोली भाषा बोलतो तेव्हा प्रेक्षक पोट धरधरून हसतात. मात्र देव, इतर पात्रे आणि राक्षस पात्रेसुद्धा शुध्द बोली बोलण्याचा प्रयत्‍न करतात.दशावतारात पुराणकथा सादर केल्या जातात. हरिविजय, भक्तिविजय ग्रंथांतील चित्रे पाहून या कलावंतांनी वेषभूषेची प्रेरणा घेतली. त्यांतील कथानके आख्यानासाठी निवडली. चित्रांत दिसणा-या किंवा परंपरेने मनात असलेल्या रंगसंगतीत ते ते पात्र दिसले पाहिजे, याकडे कलाकारांचे लक्ष असते.

               रंगभूषेच्या बाबतीत काही ठिकाणी गेरू, काळा कोळसा आणि रंग पूर्वी वापरले जात. राक्षस पार्ट्यांची रंगभूषा अधिक भडक, उग्र स्वरूपाची असते तर देवांची सात्त्विक स्वरूपाची. दशावतारात काम करणारे कलावंत जत्रांच्या हंगामाखेरीजच्या दिवसांत शेतीभाती किंवा इतर व्यवसायांत गुंतलेले असतात. दशावतार नाटके गोव्यात विविध उत्सवांत सादर केली जातात. गोव्यातही त्याचा प्रेक्षकवर्ग मोठा आहे.सुगीनंतर देवतोत्सवात वा चातुर्मास्यात जत्राप्रसंगी दशावतारी खेळ करण्याची पूर्वापार प्रथा आहे. वेंगुर्ले, सावंतवाडी, मालवण आणि गोवा प्रमाणे देवगड भागातही दशावतारी नाटके लोकप्रिय आहेत. 

         तुळशीच्या लग्नापासून विविध जत्रांमध्ये कोकणात दशावतारी खेळ सुरू होतात ते मे महिन्यापर्यंत चालतात. पूर्वरंग हा दशावताराचा आत्मा असतो. आता मात्र पूर्वरंगाला दशावतारात फाटा दिलेला असतो.